१ सप्टेंबर, २०२१

मराठी गझलेतील सामाजिक जाणीव - २

         फेसबुक आणि व्हाटसअप सारख्या समाजमाध्यमांमुळे अभिव्यक्तीचा परीघ विस्तारला आहे. पण या माध्यमांमुळे लाइक आणि कमेंट्च्या जाळ्यात अनेक कवी – गझलकार अडकलेले दिसतात. त्यामुळे कविता असो की गझल हे एक प्रसिद्धीचे माध्यम बनत चालले आहे. पण खरं म्हणजे कविता लिहिणे हे एक व्रत आहे. सवंग प्रसिद्धीसाठी यमक किंवा गझलेतील रदीफ-काफिये जोडून नुसतेच पांढ-याचे काळे करणे म्हणजे कविता, गझल नव्हे. पण सोशल मिडियाच्या फुगवटाधारी काळातही व्रतस्थपणे लेखन करत आपल्या कविता-गझलांमधून सामाजिक बांधिलकी जपणारे कवी-गझलकार आजही अस्तित्वात आहेत. 
.............................

       कविता-गझल हे स्वतःला व्यक्त करण्याचं एक साधन आहे. आपल्या मनात खोलवर असलेल्या नेणिवेच्या गुहेत दैनंदिन जीवनातल्या सर्व बारीक -सारीक गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात. त्याची आपल्याला यत्किंचितही जाणीव नसते. जाणीवेच्या पातळीवर त्या गोष्टी कधीही समोर येत नाहीत. पण मनात अशा गोष्टींची गर्दी वाढली की त्या बाहेर पडण्यासाठी माध्यम शोधत असतात. जगताना झालेल्या जखमा, दुःख, वेदना, इच्छा, अपेक्षा यांना तर जास्त काळ मनातच साठवून ठेवताच येत नाही. अशा गोष्टी जर मनात साठवून ठेवल्या तर त्या भयावह स्वरूपात बाहेर पडू शकतात. आपल्या वेदनांना वाट करून देण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे गझल! गझल नेणीवेच्या दाराचा पासवर्डच असते! ती जाणीवेतला आणि नेणीवेतला दुवा बनून माणसाला जुनं सर्व काही विसरून नव्यानं जगायला शिकवते, आपल्या दुःखातून बाहेर पडून इतरांच्या दुःखात सहभागी व्हायला शिकवते. गझलेच्या शेरात माणसाचे खरेखुरे जगणे चित्रित होणे अपेक्षित असते. मुळात चांगल्या कवितेची ही पहिली कसोटी आहे की ती माणसाचे जगणे मांडणारी असावी. ‘पोएटीक लिबर्टी’च्या नावाखाली हाडाच्या वाचकालाही न समजणारे अनाकलनीय, अतार्किक लिहीत राहणे म्हणजे कविता नाही. कविता जेव्हा वाचकाला आपलीशी वाटू लागते, आपल्या भावना व्यक्त करणारी वाटते तेव्हा तिचे स्वरूप वैश्विक झालेले असते. तुकारामांचे अभंग किंवा कबीराचे दोहे आजही लोकांना तोंडपाठ आहेत. त्यांच्या काव्यात देश-काल-परिस्थितीच्या सीमा भेदून पुढे जाण्याची शक्ती आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्या काव्यात माणसांचे जगणे चित्रित झाले आहे. सुप्रसिद्ध शायर बशीर बद्र जेव्हा
 
लोग टूट जाते हैं एक घर बनाने में 
तूम तरस नहीं खाते बस्तिया जलाने में

   असे म्हणतात तेव्हा गरीब माणसाला आपली एक छोटशी झोपडी बांधण्यासाठी कितीतरी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. बशीर बद्रांसारखा शायर ते सोसणं आपल्या डोळ्यांनी पाहतो. त्या झोपडीला जेव्हा स्वार्थी राजकारणी जाती-धर्माची आग लावून त्यावर आपली पोळी भाजतात तेव्हा सामाजिक भान असलेल्या बशीर बद्रांसारख्या संवेदनशील कविचे मनही जळते. स्वार्थी राजकारणी चेह-यावर कैवारीपणाचा मुखवटा लावून फिरतात पण त्यांना जनतेचे काहीही घेणेदेणे नसते. म्हणूनच नांदेडचे मारोती मानेमोड म्हणतात - 

पेटलेली आग ही पोटात आहे;
भूक माझी का तरी अज्ञात आहे?
न्यायदाते, राज्यकर्ते चोर झाले;
 देश बाकी जायचा कोमात आहे

                     आजची परिस्थिती पाहता असे वाटते की खरोखरच देश कोमात जायचाच बाकी आहे. दारिद्र्य, बेरोजगारी अशा समस्या सामान्य माणसापुढे आ वासून उभ्या आहेत. राज्यकर्ते बदलतात पण गरिबांची भूक तर आजही अज्ञातच आहे. कोणतही सरकारी काम म्हटलं की टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय फाइल पुढे सरकतच नाही. त्यामुळेच देशाच्या विकासाचे तीन तेरा वाजले आहेत. दरवर्षी विकास कामांच्या फाइलींचे ढिगारेच्या ढिगारे मंत्रालयात गोळा होतात पण विकास मात्र सापडत नाही. तेव्हा अमरावतीचे नितीन भट म्हणतात -  

या देशाचा विकास होता होता...
सरकारी फायलीत अडला आहे !

        देशाचा विकास जसा सरकारी फाइलीत अडकला आहे तसाच तो समाजात पसरलेल्या अनेक अंधश्रद्धांमुळेसुद्धा अडला आहे. गाडगेबाबांसारख्या संतांनी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केले परंतु लोकंच्या डोक्यातला कचरा मात्र काही केल्या साफ होत नाही. देशाच्या संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. प्रत्येकाने आपला आपल्या धर्माची उपासना करावी पण लोक धर्माच्या नावाखाली चलणा-या अंधश्रद्धांना आज मुठमाती देणे आवश्यक झाले आहे. हीच गोष्ट धरणगावचे ज्ञानेश पाटील अत्यंत वेगळ्या पद्धतीने मांडतात. 

थेट लोटांगण अताशा घेत नाही मी ,
खरवडूनी पाहतो शेंदूर थोडासा

   खरे तर बुरसटलेल्या विचारसरणींचा मनावर साचलेला शेंदूर काढणे काळाची गरज आहे. लोटांगण घालण्याआधी ज्ञानेश पाटलांसारख्या लोकांना शेंदूरामागे लपलेला देव एकदा तपासून पहावासा वाटतो. दुसरीकडे मात्र मंदीरांसमोर दर्शनासाठी कित्येक किलोमीटर पसरलेल्या रांगाच्या रांगा दिसतात. अकोल्याच्या अरविंद पोहरकरांनाही एक वेगळा साक्षात्कार झालेला दिसतो. ते म्हणतात -  

दर्शनाला मंदिराची पायरी मी चढत नाही 
मी सकाळी लेकराचा चेहरा पाहून घेतो !

                     पोहरकरांना लेकराच्या निरागस चेह-यातच देव दिसतो. पण आजकाल लोकांची मेंढरांसारखी अवस्था झाली आहे. डोक्यातला विचार करण्या-या पेशीच निकामी झाल्यात की असे वाटते. हजारो मेसेज रोज विचार न करता ‘व्हायरल’ केले जातात. आपण काय फॉरवर्ड करतो याचा तीळमात्र विचार कोणी करताना दिसत नाही. कधीकाळी रेड्याच्या तोंडून ज्ञानेश्वरांनी वेद म्हणवून घेतल्याचे घेतल्याचे ऐकिवात आहे. ती गोष्ट आजच्या विज्ञान युगात काही खरी वाटत नाही किंवा दुसरा एखादा रेडा पुन्हा बोलल्याचे सुद्धा कधी कोणी पाहिले नाही पण ज्ञानेश्वरांचा हेला समाधीतून निघून दुध द्यायला लागला आहे असा मेसेजही कोणी कधी पाठवला तर आगीसारखा व्हायरल होऊ शकतो अशी आजची परिस्थिती आहे. सासवडचे शुभानन चिंचकर हीच गोष्ट आपल्या शेरातून मांडतात -    

व्हायरल झालाय हा मेसेज रातोरात येथे 
की नव्या ज्ञानेश्वरांचा देत आहे दूध हेला

  पण ही गोष्ट कोणाच्याच लक्षात येत नाही. आणि कुणाला काही समाजावून सांगणे हा आजकालच्या काळात मोठा गुन्हा आहे. चुकून व्हायरल झालेल्या झालेल्या पोस्टवर कोणी विरोधातली कमेंट केली रे केली अंधभक्त लगेच गोळा होतात. शिवीगाळ करू लागतात. नको तिथे संवेदनशीलता दाखवली जाते. तेव्हा नागपूरच्या अनंत नांदूरकर ‘खलिश’ यांचा शेर आठवतो -   

जसे आभाळ कोसळते सश्यावर पानही पडता
तश्या संवेदना झाल्या कुणी काही जरा म्हणता
                         मराठी गझलेत अनेक गझलकार आपल्या गझलेतून समाजातले अनेक प्रश्न हाताळताना दिसतात. अनेक गझलकार स्त्रीयांची व्यथा आपल्या शेरांमधून मांडतात. जन्म होण्या आधीपासूनच एका स्रीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अकोल्याचे अमित वाघ लिहितात - 

बदलू कसे स्वतःचे गर्भात लिंग आई?
निष्पाप अर्भकाचा साधा सवाल होता

   आज भारतातले लिंगगुणोत्तर पाहिले असता वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा हवा असतो. हाच मुलगा पुढे आईबापाला वृद्धाश्रमात पाठवतो. जन्म होण्याआधीच गर्भावर अपेक्षांचे ओझे लादले जाते. अमित वाघांचा स्त्रीगर्भाची व्यथा मांडणारा उपरोक्त शेर खूपच ह्रदयस्पर्शी आहे. 
    गझलेचा प्रसार प्रचार गावखेड्यापर्यंत होत आहे. अनेक लोक गझल लेखनाकडे वळत आहेत. आज सोशल मिडियामुळे लेखनावर कोणाचीही मक्तेदारी राहिलेली नाही. आशयाची तीच ती आवर्तने टाळली गेली आणि माणसाचे खरेखुरे जगणे गझलेत आले तर निश्चितच मराठी गझल सुद्धा मराठी भाषेचे अस्तित्व आहे तोपर्यंत जिवंत राहू शकेल. गझलकार आणि ज्यांच्याविषयी, ज्यांच्यासाठी गझल लिहिली जात आहे त्यांच्या भाषेत जोपर्यंत ती लिहिली जात नाही तोपर्यंत मराठी गझल वाचकाभिमुख होणार नाही. आपल्या काव्यातील संवेदना व सामाजिक मूल्य वेळोवेळी तपासत राहणे, हे कुठल्याही काळात लिहिणाऱ्या कवी-गझलकाराचे नैतिक कर्तव्य असले पाहिजे. हे कर्तव्य अनेक गझलकार पार पाडताना देखील दिसतात. त्यामुळे मराठी गझलेचे भवितव्य उज्वल आहे.
.....................
अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४

३ टिप्पण्या: